पुणे जिल्ह्यातील ‘या’ बसस्थानकाची अवस्था सर्वात दयनीय…

शिरूर : बसस्थानकाचे मागिल दोन वर्षांपासून खासगीकरणाच्या माध्यमातुन विकासाचे काम सुरू आहे. बीओटीच्या कामामुळे, कोरोनाचा कहर आणि एसटी कामगारांच्या संपामुळे मूळातच घरघर लागलेल्या पुणे जिल्ह्यात शिरूर बसस्थानकाचे चित्र सध्यातरी अत्यंत दयनीय झाली आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य दिमाखात मिरवणाऱ्या एसटीच्या शिरूर स्थानकावर मात्र सर्वच मूलभूत सुविधा कोलमडून पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरम्यान, स्थानकाच्या मुख्य इमारतीचा काही भाग वगळता कॅंटीनसह इतर सर्व जमिनदोस्त केल्याने प्रवाशांना साधी बसण्यास ही जागा नाही. पाण्याची टाकी आहे पण, त्यात पाणी नाही. यामुळे पाण्याच्या बाटल्या विक्रेत्यांची चंगळ झाली आहे. स्वच्छतेचा कुठलाही मागमूस उरला नसून, प्रवाशांच्या निवाऱ्यासाठी तात्पुरते पत्राचे शेड उभारले आहे.
शिरूर आगारातील नव्वद टक्के कामगार प्रवासी सेवेत रुजू झाल्याने, येथील अपवाद एक-दोन बस वगळता लालपरी आता गतिमान झाली आहे. लोकलबरोबरच लांब पल्ल्यांच्या बसेसही सुरळीतपणे मार्गस्थ झाल्याने दुरावलेला प्रवासी अल्पावधीतच एसटीकडे परतू लागला आहे, असे असले तरी जुळलेला हा प्रवासी टिकवून ठेवण्यासाठीचे नियोजन व त्याच्या सुविधांबाबत शिरूर बसस्थानकावर उदासिनताच जाणवते.