पुढची भूमिका काय? उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक; आमदार, खासदार राहणार उपस्थित

मुंबई : (Uddhav Thackeray Meeting) निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना दिलं आहे. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शनिवार दि. 18 फेब्रुवारी तातडीने पक्षाची बैठक (Meeting) बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदार, खासदार (MLA-MP) आणि नेते उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी एक वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे.
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता पुढची भूमिका काय असणार यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी मतदारसंघात असलेले आमदार आणि खासदार तत्काळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर येत्या 21 फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात नियमीत सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यता आली होती. मात्र, त्यांची हि मागणी डावलत निवडणूक आयोगाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयाआधी निर्णय देण्याची निवडणूक आयोगाने एवढी घाई का केली? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. न्यायव्यवस्था दबावाखाली कशी येईल, याची अनेक उदाहरणं पाहिली आहेत. मात्र हा निर्णय अत्यंत अनेपेक्षित आहे, कारण जवळपास सहा महिने सर्वोच्च न्यायालयत हे प्रकरण सुरु आहे. त्याची आता सलग सुनावणी सुरु होईल. तो निकाल लागेल तोपर्यंत निवडणूक आयोगानं निर्णय देऊ नये अशी मागणी आम्ही केली होती. लोकशाहीच्या दृष्टीने कालचा निकाल अत्यंत घातक आहे. लोकशाही संपली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सांगावं. लोकशाहीला आदरांजली वाहून बेबंदशाहीला सुरुवात झाल्याचं मोदींनी जाहीर करावं, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.