मुंबईकरांनो २ दिवस पाणी जपून वापरा; वैतरणा जलवाहिनीत बिघाड, पाणीपुरवठा कपात

राजधानी मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांपैकी एक असलेल्या वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमध्ये ताराळी (जिल्हा ठाणे) येथे ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे जलवाहिनी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडूप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये (Water) ५ ते १० टक्के इतकी घट झाली आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी गुरूवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ ते शुक्रवार १८ ऑक्टोबर २०२४ या दोन दिवसांच्या कालावधीत ५ ते १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे, नागरिकांनी दोन दिवस पाणी जपून वापरण्याचा सल्ला महापालिकेकडून देण्यात आला आहे. राज्यात यंदा चांगला पाऊसकाळ झाला असून मुंबईतील सर्वच धरणंदेखील तुडूंब भरली आहेत. त्यामुळे, मुंबईकरांना यंदा पाण्याची झंझट असणार नाही. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे पाणीकपात होत असल्याने पाणी जपून वापरावे लागणार आहे.
मुंबई शहर व उपनगरास मुख्यत्वे वैतरणा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणामधून पाणी वाहून नेणा-या वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमधील ताराळी (जिल्हा ठाणे) येथे ९०० मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी धरणामधून पाणी वाहून नेणारी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे. परिणामी, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात (मुंबई शहर व उपनगर) पाणी पुरवठा करणा-या भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठयामध्ये ५ ते १० टक्के घट होणार आहे. या दुरूस्ती कामासाठी सुमारे 48 तास इतका कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी गुरूवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ ते शुक्रवार १८ ऑक्टोबर २०२४ या दोन दिवसांच्या कालावधीत ५ ते १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
दरम्यान, गत महिन्यातही मुंबई शहरातील के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगमवाहिनीवरील (आऊटलेट) झडपा (वॉल्व्ह) बदलण्याच्या कामामुळे गुरुवार, १९ सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून प्यावं असं आवाहनही महानगरपालिका प्रशासनाने केलं होतं.