राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

काय होणार विधान परिषद निवडणुकीत?

प्रा. अशोक ढगे

एका विशिष्ट परिस्थितीत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले असून तिन्ही पक्षांचे आमदार आणि अपक्ष तसेच लहान पक्ष यांचा मानसन्मान राखायलाच हवा, असे पवार यांनी निक्षून सांगितले. असे असले तरी गेल्या अडीच वर्षांमधली बेदिली, दुजाभाव आणि अहंकाराचा हिशेब या निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यसभा निवडणुकीने भाजपचे मनोधैर्य वाढवले तर महाविकास आघाडी सावध झाली. आमदारांशी चांगला संपर्क न राखल्याची, त्यांची कामे नीट न केल्याची नाराजी शिवसेनेला राज्यसभेत भोवली. गेल्या वेळी भाजप सेनेला धडा शिकवण्याच्या मूडमध्ये होता. या वेळी भाजपचं लक्ष्य एकनाथ खडसे असणार आहेत. मात्र क्षमतेबाहेर जाऊन मतांची बेगमी करण्याची गरज असल्याने भाजपला पाचवा उमेदवार निवडून आणणे सोपे नाही. राज्यसभेसाठी मतदान गुप्त नव्हते. विधान परिषदेच्या सदस्यांच्या निवडीसाठी मात्र गुप्त मतदान असणार आहे. त्यामुळे कुणी कुणाला मत दिले, हे शेवटपर्यंत कळणार नाही. आमदारांना सांभाळण्याची वेळ या वेळी शिवसेनेपेक्षा काँग्रेसवर जास्त आहे.

राज्यसभा निवडणुकीत जोरदार आपटी खाल्ल्यानंतर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा होती; मात्र काँग्रेसने दुसरा उमेदवार कायम ठेवल्याने आता येत्या २० जूनला विधान परिषदेच्या निवडणुकीचा सामना रंगणार आहे. संख्याबळ कमी असताना राज्यसभेच्या निवडणुकीत घडवला तसाच चमत्कार घडवण्याचा विडा फडणवीस यांनी उचलला आहे. आघाडीच्या आमदारांमध्ये धुमसत असलेल्या असंतोषाचा राजकीय लाभ उचलण्याची भाजपची रणनीती आहे; परंतु ही रणनीती यशस्वी होते, का हे पाहावं लागेल. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आघाडीचे सहा आणि भाजपचे पाच असे ११ उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी दोन जागा लढवत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी रयत संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेसही आपला दुसरा उमेदवार मागे घेणार असल्याचं बोललं जात होतं; मात्र काँग्रेसने दोन्ही उमेदवार रिंगणात कायम ठेवले. विधान परिषदेसाठी भाजपमध्ये नाराजी आहे. मित्रपक्षही भाजपवर नाराज आहेत. असं असलं तरी पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत आणि विनायक मेटे भाजपला धडा शिकवू शकतील, अशी परिस्थिती नाही. शिवाय राज्यातले आणि केंद्रातले भाजपचे सर्वच नेते पाठीशी असल्याने फडणवीस म्हणतील ती पूर्वदिशा असे सध्याचे चित्र आहे.

विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला २७ मतांची गरज आहे. अशा वेळी भाजप आणि मित्रपक्षांकडे मिळून ११३ इतकं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपच्या चार जागा सहज निवडून येऊ शकतात; मात्र पाचव्या जागेसाठी भाजपला २२ मतांची गरज लागणार आहे. राज्यसभेत भाजपला पहिल्या पसंतीची १२३ मतं मिळाली. विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान पद्धती आहे. त्यामुळे त्यात अजून भर पडू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो; मात्र २२ आमदार फोडणं तितकंसं सोपे नाही. राज्यसभेला दहा आमदार भाजपच्या गळाला लागले; आता त्यात आणखी बारा आमदारांची भर पडावी लागेल. तेव्हा कुठे भाजपचा पाचवा उमेदवार विजयी होऊ शकतो. २२ आमदार भाजपच्या गळाला लागले तर महाविकास आघाडीला मोठा फटका सहन करावा लागू शकतो. महाविकास आघाडीतले घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी होण्यात कोणतीही अडचण नाही; मात्र काँग्रेसचा एकच उमेदवार निवडून येईल इतकं संख्याबळ आहे. काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येत असली, तरी त्यांच्याकडे पहिल्या पसंतीची मतं शिल्लक राहत आहेत. दुसर्‍या उमेदवारासाठी त्यांना दहा तर भाजपला २२ मतांची गरज भासणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार पाचवा उमेदवार निवडून आणणे भाजपला सोपे नाही; परंतु या निवडणुकीसाठी गुप्त मतदान असल्याने भाजपला चमत्काराची अपेक्षा आहे.

शिवसेनेकडे सध्या ५५ आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे निर्धोक निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ आमदार असल्याने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांनाही कोणतीच अडचण नाही. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क मिळाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची दोन मतं कमी होऊ शकतात, तरी इतर अपक्षांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना विजय मिळवणं अवघड नाही. काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. त्यावर चंद्रकांत हंडोरे सहज निवडून येतील. काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना बाहेरून दहा मतांची मदत लागणार आहे. शिवसेनेकडील अधिक मतं, अपक्ष आणि इतर छोटे पक्ष यांच्याकडून मदत मिळवण्यासाठी जगताप यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्यसभेसाठी शिवसेनेने जेवढी प्रतिष्ठा पणाला लावली, तेवढी आता लावणार का आणि नियोजन करणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. भाजपकडे स्वतःचे १०६ आमदार आहेत. याशिवाय सहा अपक्ष त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे त्यांचे प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रा. राम शिंदे हे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

त्यासाठी त्यांना एकूण १०८ मतं आवश्यक असतील. प्रसाद लाडना निवडून येण्यासाठी बाहेरून २३ मतांची गरज पडेल. मनसेचं एक मत त्यांच्या सोबत जाऊ शकतं. त्यामुळे अतिरिक्त किमान २२ मतांची व्यवस्था त्यांना करावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने रामराजे आणि खडसे या दोघांनाही निवडून आणणं तितकंच महत्त्वाचं आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत खडसे यांचं नाव होतं; परंतु गेली दोन वर्षं राज्यपालांनी ही यादी बाजूला ठेवली आहे.
या वळणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक असलेले खडसे यांना पाडण्याचं मास्टर प्लॅनिंग भाजपने केल्याची सूत्रांची माहिती आहे. खडसे विधान परिषदेत आले तर भाजप आणि फडणवीस यांचं वस्त्रहरण करण्यास उपयुक्त ठरतील. खडसे यांचं हे महत्व लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस खडसे यांचा कोटा वाढवण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दहाव्या जागेसाठी भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड या उमेदवारांमध्ये अटीतटीचा सामना होईल, अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला १७१ आमदारांचं पाठबळ असतानाही राज्यसभा निवडणुकीत आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. यामागे अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांची नाराजी प्रकर्षाने समोर आली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांनाही काही युक्तीच्या गोष्टी सांगितल्या असतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये