कात्रज बोगद्याजवळ पेटला भीषण वणवा

पिकांसह फळेही खाक
पुणे : पुणे-बंगळुरू मार्गावरील कात्रज नवीन बोगद्याच्या आसपासच्या परिसरातील डोंगरांवर भीषण वणवा पेटल्याची घटना घडली आहे. यात आसपासचे संपूर्ण डोंगरच्या डोंगर जळून खाक झाले आहेत. वणव्यामुळे डोंगरांवर रोषणाई केल्यासारखे दृश्य दिसत होते. वणवा लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे डोंगरावर असणार्या करवंद, बोरं, आंबा, याबरोबरच इतर जंगली वनस्पती आणि फळे वाया जात आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान यामुळे झाले आहे. त्याचबरोबर सरपटणारे प्राणी, पक्षी यांसारख्या वन्यप्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. वणव्यांपासून वनसंपदेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून आणि पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडली असल्याने अशावेळी तो विझवणेही अवघड होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आधीही घडल्या घटना
कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ याआधीही वणव्याच्या घटना घडल्या आहेत. राज्य सरकार दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी राज्यभरात मोठा उपक्रम राबवत आहे. मात्र ज्या तुलनेत वृक्षलागवड केली जात असेल, त्याच्या तुलनेत दुप्पट वनसंपदा गेल्या काही काळात डोंगरावर लागणार्या आगींमध्ये खाक होत आहे. याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले की काय, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. वन विभागाकडे पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसावी का, अशी शंका घटनेमुळे निर्माण होत आहे.