कुणी कितीही प्रयत्न केला, तरी माझं नाव…- देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई : राज्य सरकार १ मे रोजी मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न करत असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना आदेश दिले आहेत. तसंच एकीकडे नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे या रस्त्याच्या श्रेयाचा वाद निर्माण झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा घाट घालताना शिवसेना त्याचं श्रेय घेत असल्याचा दावा केला जात असताना आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘समुद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे, त्यासाठी मला आनंद झाला आहे. मला इतकच वाटतंय की त्याची कामं पूर्ण झालेली नाहीत. ती पूर्ण करुनच उद्घाटन झालं, तर चांगलं होईल. घाईघाईत उद्घाटन आटपून घेतलं तर रस्ता सुरू होईल, पण त्यातून त्या रस्त्याला जे महत्त्व आहे ते कमी होईल. त्याचं कधीही उद्घाटन झालं तरी, त्यांचं मी स्वागतच करेन.’
पुढे फडणवीस यांना शिवसेनेकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी ठाकरे सरकारला खोचक शब्दांत टोला लागवला. ‘कुणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव समृद्धी महामार्गावरुन मिटवता येणार नाही. ते काही माझं श्रेय नाही. जनतेनं तेव्हा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. ही संकल्पना २० वर्ष माझ्या डोक्यात होती की अशा प्रकारचा रस्ता झाला पाहीजे. तेव्हा आम्ही ते करु शकलो.’
‘मला या गोष्टीचा आनंद आहे, की तेव्हा या रस्त्याला जे मोठ्या प्रमाणात विरोध करत होते, ते लोक देखील आज या रस्त्याच्या उद्घाटनाचा प्रयत्न करत आहेत.’ असंही फडणवीस म्हणाले.