मुंबई : सध्या आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू असून यातील सर्वच सामने अटीतटीचे होत आहेत. कोणता संघ कधी सामना फिरवेल हे सांगणे कठीण झाले आहे. त्यातही नव्या आलेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांनीदेखील चांगली खेळी करुन दाखवलेली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत कोण धडक मारणार याचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. असे असताना भारताचा माजी क्रिकेटर हरभजनसिंगने संतप्त सवाल केला आहे. यामध्ये सगळे धोनीने वर्ल्ड कप जिंकला असे म्हणतात. मग बाकीचे दहा खेळाडू काय लस्सी पित होते का ? असं वक्तव्य केलं आहे. हरभजनसिंह सध्या सुरु असलेल्या आयपीएल सामन्यांवर मत मत मांडण्यासाठी एका कार्यक्रमात बोलत होता. यावेळी त्याने हे वक्तव्य केलं आहे.
जेव्हा ऑस्ट्रेलिया विश्वचषक जिंकतो तेव्हा ऑस्ट्रेलियाने विश्वचषक जिंकला अशा बातम्या दिल्या जातात. मात्र भारताने विश्वचषक जिंकल्यावर मात्र धोनीने विश्वचषक जिंकला असं म्हटलं जातं. मग बाकीचे दहा खेळाडू काय लस्सी पिण्यासाठी गेले होते का ? गौतम गंभीरने काय केलं होतं ?” असं हरभजनने म्हटलं आहे. तसंच पुढे बोलताना क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. संघातील सात ते आठ खेळाडू जेव्हा चांगल्या पद्धतीने खेळतात तेव्हाच संघ पुढे जाऊ शकतो, असं देखील हरभजन सिंग म्हणाला आहे.
दरम्यान, भारताने २०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात विश्वचषक जिंकला होता. यावेळी भारताच्या संघात हरभजनसिंगही सहभाही होता. त्यावेळी भारताने सहा गडी राखून श्रीलंकेवर मात केली होती. तर या सामन्यात धोनीने ९१ धावा केल्या होता. गौतम गंभीरने ९७ धावा केल्या होत्या. भारताने सहा गडी राखून २७५ धावांचे लक्ष्य गाठले होते.