“अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान”-सुप्रिया सुळे
!["अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान"-सुप्रिया सुळे supriya sule and narendra modi in dehu 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/supriya-sule-and-narendra-modi-in-dehu-1-780x470.jpg)
पुणे | Supriya Sule On PM Narendra Modi – श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मादी देहू दौऱ्यावर आहेत. या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचे देहूत आगमन झालं आहे. तसंच पंतप्रधानांच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी वारकऱ्यांशी संवाद साधला. मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील श्री क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच आले होते. त्यानिमित्ताने संत तुकाराम महाराज देवसस्थानने पंतप्रधानांच्या स्वागताची तयारी केली होती. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील तेथे उपस्थित होते. परंतू त्यांना त्यावेळी बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आता जोरदार निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना बोलू न देणं हे दुर्दैव असून तो महाराष्ट्राचा अपमान असल्याचं म्हटलं आहे.
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मिनिट टू मिनिट कार्यक्रमात प्रोटोकॅालनुसार महाराष्ट्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाला अजित पवारांचं भाषण व्हावं यासाठी माहिती पाठवली होती. परंतु त्यांची विनंती मान्य झाली नाही. त्यांना बोलू न देणं हे दुर्दैव आहे. हा महाविकास आघाडीवर अन्याय आहे. विरोधी पक्षांना भाषण करुन देता पण आमच्या नेत्यांना करु देत नाही, ही दडपशाही आहे. आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचं काम केलं आहे. प्रोटोकॅालप्रमाणे त्यांना भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती.”
अजित पवार यांना राज्यातील शेतकऱ्यांचे, वारकऱ्यांचे प्रश्न माहीत आहेत. पुणे जिल्हा हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. त्याठिकाणी कार्यक्रम होत असताना महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांना बोलू देण्यात आलं नाही हा अपमान जाणुनबुजुन करण्यात आला का? हा महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राला कमी लेखण्याचा हा प्रकार होता का? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केले आहेत.