“कोणी काय सत्तेचा तांब्रपट घेऊन जन्माला आलं नाही”; अजित पवारांची सरकारवर टीका

मुंबई : (Ajit Pawar On State Government) एकनाथ शिंदे यांचं सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर या सरकारने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय रद्द केले आहेत. महाविकास आघाडीने कांजूर मार्ग मेट्रो प्रकल्पाचा निर्णय घेतला होता. मात्र नव्या सरकारने आरे कारशेड मार्गेच मेट्रो करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकराने मंजूर केलेला जिल्हा नियोजन समितीचा निधी सरकारने रद्द केला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपुर्वी आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहिर करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभुमीवर पवार म्हणाले, ओबीसी समाजाला आरक्षण न देता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणााठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर काम केले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आरक्षणाचा विचार करावा, अशी मागणी आहे.
सरकार येते आणि जाते, कोणी काय सत्तेचा तांब्रपट घेऊन जन्माला आलं नाही. सरकार बदलले म्हणून विकासाचा निधी रद्द करायचा नसतो. उठसूट सर्वच निर्णय रद्द करायचे नसतात, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली. राज्यातील विकास प्रकल्पांना सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. विकास प्रकल्पात राजकीय भूमिका बाजूला ठेवून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेतला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी आरे कारशेडवरून सरकारला दिला.