भारतात बांगलादेशीं नागरिकांची घुसखोरी; तीन जणांना पाच वर्षांचा तुरुंगवास

तीन बांगलादेशींना भारतात अवैध घुसखोरी आणि बनावट कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने हा निकाल दिला.
मोहम्मद हबीबुर रहमान हबीब उर्फ राज जेसूब मंडल, हन्नान अन्वर हुसेन खान उर्फ हन्नान बाबुरअली गाझी आणि मोहम्मद अजराली सुभानल्ला उर्फ राजा जेसुब मंडल हे मुळचे बांगलादेशचे नागरिक आहेत. या तिघांनी भारतात अवैध घुसखोरी केली. या प्रकरणी एनआयएने आरोपींना ताब्यात घेतले होते. एनआयए विशेष न्यायालयाने तिघांना दोषी ठरवले होते. आज आरोपींना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी २०१८ मध्ये केला होता गुन्हा दाखल
मोहम्मद हबीबुर रहमान हबीब उर्फ राज जेसूब मंडल, हन्नान अन्वर हुसेन खान उर्फ हन्नान बाबुरअली गाझी आणि मोहम्मद अजराली सुभानल्ला उर्फ राजा जेसुब मंडल या तिघांनी भारतात अवैध घुसखोरी केल्याचे २०१८ मध्ये उघडकीस आले होते. पुणे पोलिसांनी वैध कागदपत्रांशिवाय पुण्यात राहणाऱ्या अनेक बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल केला होता. हे तिघेही दहशतवादी संघटना अल कायदाला मदत करत असल्याचा आरोप होता. एनआयएने ७ सप्टेंबर २०१८ रोजी या तिघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.