अजित पवार-फडणवीसांत जुंपली! उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ टीकेला अजितदादा म्हणाले…
![अजित पवार-फडणवीसांत जुंपली! उपमुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ टीकेला अजितदादा म्हणाले... Fadnavis And Pawar](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/05/Fadnavis-And-Pawar--780x470.jpg)
मुंबई : (Ajit Pawar On Devendra Fadnavis) महाविकास आघाडीच्या मंगळवारी मुंबईत झालेल्या वज्रमूठ सभेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचं अरण्यरुदन आहे. सत्ता गेल्याने हे लोक निराश आणि बावचळलेले आहेत.
फडणवीस म्हणाले की, विरोधकांचा आता तोल जातोय. त्यामुळे अशा लोकांनी टीका केल्यावर ती किती गांभीर्याने घ्यायची, याचा विचार आता आपण सर्वांनी केला पाहिजे”. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारलं असता, अजित पवार म्हणाले, टीका करणं हा त्यांचा (देवेंद्र फडणवीस) जन्मसिद्ध हक्क आहे.
अजित पवार म्हणाले, मी जर त्यांच्यावर टीका केली नाही तर तुम्ही म्हणता याचं काहीतरी साटंलोटं आहे. आता टीका केली तर म्हणतायत नैराश्य आलंय. दरम्यान, कालच्या भाषणाबद्दल अजित पवार म्हणाले, मी योग्य मुद्दे काल मांडले. राजू शेट्टींनी मांडलेला बदल्यांचा मुद्दा उचलून धरला. राजू शेट्टी हे आधी भाजपसोबत होते, आघाडीसोबतही होते. ते सगळीकडे असतात. त्यांनी हा मुद्दा उपस्थित करणं मोठी गोष्ट आहे.
फडणवीस म्हणाले होते की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना केवळ आमच्यावर टीका करायची आहे. अडीच वर्ष सत्तेत असताना त्यांनी एकही विकासकाम केलं नाही. आताही ते केवळ आमच्यावर टीका करतायत. परंतु आम्हाला विकास करायचा आहे. आम्ही मंगळवारी ३५० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चं उद्घाटन केलं.