“रवी राणांना पुढे करून कोणी गेम करत असेल तर…”, बच्चू कडूंचा इशारा

मुंबई | Bacchu Kadu On Ravi Rana – गेल्या काही दिवसांपासून प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन 50 खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. रवी राणांनी आरोप करायचे आणि मी गप्प बसायचं हे माझ्याकडून शक्य होणार नाही. कारण ही अस्तित्वाची लढाई आहे, असं कडू म्हणाले. मला गप्प बसवलं जात असेल आणि त्यांना आवर घातला जात नसेल तर मी ऐकणार नाही, असा इशाराही कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांनी एबीपी माझा कट्ट्यावर हजेरी लावली होती. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बच्चू कडू म्हणाले, आमदार रवी राणा यांनी टीका केली त्याचं वाईट वाटत नाही, पण त्यांनी ज्या पद्धतीचे शब्द वापरले ते योग्य नाही. राणांनी आरोप करणं आणि गप्प बसणं हे शक्य नाही. तसंच रवी राणांना कोणी पुढे करत आहे का? असा प्रश्न कडूंना यावेळी विचारण्यात आला, त्यावेळी ते म्हणाले, जर असं कोणी राणांना पुढे करून गेम करत असेल तर मी सहन करणार नाही. मग मी राजकारणही सोडून देईन, मग फक्त बच्चू कडू म्हणून लढेन. माझा एक स्वभाव आहे आमने सामने लढलं पाहिजे, मागून वार केला तर मी सहन करू शकणार नाही. त्यामुळं मी कोणत्याही स्तरावर जायला तयार आहे, असा थेट इशारा बच्चू कडू यांनी रवी राणांना दिला आहे.
मी पैसे घेतले असं रवी राणा म्हणत आहेत. मग ते पैसे कोणी दिले असं म्हटलं तर. पैसे एकनाथ शिंदेंनी दिले की देवेंद्र फडणवीसांनी दिले. मग कोण आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिल. सत्ता पैसे देऊन स्थापन करतात का?, असा सवालही बच्चू कडूंनी यावेळी उपस्थित केला.