फडणवीसांसोबत रात्रीच्या बैठका, चर्चा कसं ठरलं सगळं? शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं!

मुंबई : (Eknath Shinde On Devendra Fadnavis) एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडखोरीच्या आधीचे अनेक किस्से सांगितले आहेत. ते म्हणाले, हा सगळा सत्ताबदलाचा कार्यक्रम आपण मुख्यमंत्रीपदासाठी केलाच नव्हता. “मित्रपक्षांच्या कारवायांमुळे शिवसेनेचे आमदार त्रस्त झाले होते.
शिंदे पुढे बोलताना म्हणाले, आमच्या आमदारांच्या मतदारसंघात मित्रपक्षाकडून त्रास दिला जात होता. पराभूत उमेदवारीला निधी पुरवला जात होता. यामुळेच आमदार बिथरले होते. पोलिसांच्या खोटया केसेस, तडीपारी हे सारे सुरू झाले होते. मी हे सारे तेव्हाच्या मुख्यमंत्र्याच्या कानावर घातले होते.
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत रात्री-अपरात्री होणाऱ्या बैठकांचा उल्लेख केला. “तो सारा काळ वेगळाच होता. आम्ही सत्ताधारी होतो. सारा फोकस आमच्यावर असायचा. अशा परिस्थितीत ‘मिशन’ किंवा ‘ऑपरेशन’ सोपे नव्हते. पण आम्ही भेटायचो, बोलायचो. बोलल्याशिवाय कसे होणार? प्रत्यक्ष भेटी वारंवार व्हायच्या. साताऱ्याला ते कधीच आले नव्हते भेटायला. दूरध्वनीवरून बोलणे शक्यच नव्हते. कारण आमचे दूरध्वनी टॅप होत असत”, असं ते म्हणाले.