“काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची चिंता करू नका”

मुंबई | भाजप नेते गिरीश महाजन यांनी देशातील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे. “काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची चिंता करू नका,” असं म्हणत गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. “राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीप्रमाणे राष्ट्रपती निवडणुकीत देखील चमत्कार होणार आहे. भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 पेक्षा अधिक आमदारांची मतं मिळतील,” असं देखील महाजन म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
यावेळी गिरीश महाजन म्हणाले, “काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणावं आता तुम्ही तुमचे आमदार सांभाळा, शिवसेनेची चिंता करू नका. शिवसेनेचे आमदार, खासदार कुणाला मतदान करणार आहेत हे सर्वांना कळेल. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार कुणाला मतदान करणार आहे याची त्यांनी चिंता करावी. काँग्रेस-राष्ट्रवादीमधील देखील अनेक आमदार भाजपाच्या राष्ट्रपदीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान करणार आहेत. निकालानंतर ते स्पष्ट होईल.”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातून आम्ही 200 मतं घेऊ. निकालानंतर 200 पेक्षा अधिक आमदारांनी भाजपाच्या उमेदवारांना मतदान केल्याचं स्पष्ट होईल. विधान परिषद व राज्यसभेप्रमाणे पुन्हा एकदा चमत्कार घडेल आणि आम्ही 200 च्या पुढे मतं घेऊ. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीला कळेल की त्यांचे आमदार कुठे आहेत,” असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.