“टिल्ल्या लोकांनी सांगायची गरज नाही” म्हणणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले, “धरणाची उंची…”

मुंबई | Nitesh Rane On Ajit Pawar – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर टीका केली होती. आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे, असं नितेश राणे म्हणाले होते. यावर “टिल्ल्या लोकांनी हे सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची किती, झेप किती त्यांना मी कशाला उत्तर देऊ”, असं खोचक प्रत्युत्तर अजित पवारांनी नितेश राणेंना दिलं आहे. दरम्यान, आता नितेश राणेंनी ट्विट करत अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
“लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरुन भाष्य केले यावरुनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची’ टीका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही”, असं नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नितेश राणेंनी नेमकी काय टीका केली होती?
नितेश राणेंनी ट्विट करत म्हटलं की, “आपण औरंगजेबाबाबत ‘औरंजगजेब क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असता ना?’ असं केलेलं वक्तव्य स्वाभाविकच आहे. कारण आपले सर्वस्व यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे! कारण त्यांनी तहआयुष्यात कधीही आमच्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक झाले नाहीत किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळाले नाही. काकाप्रमाणे पुतण्याही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नाहीत असं घोषीत करतो,” असं म्हणत नितेश राणेंनी शरद पवार आणि अजित पवारांवर टीका केली होती.
अजित पवार काय म्हणाले होते?
यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले की, “टिल्ल्या लोकांनी हे सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची किती, झेप किती त्यांना मी कशाला उत्तर देऊ. त्यांना माझे प्रवक्ते उत्तर देतील. मी असल्या लोकांच्या नादी लागत नसतो,” असं खोचक प्रत्युत्तर पवारांनी नितेश राणेंना दिलं होतं.