“…त्यांचं सगळंच ओकेमधी झालं पण इकडं महाराष्ट्र नाॅट ओके झाला”,शिंदे सरकारला प्रणिती शिंदेंचा टोला

सोलापूर | Praniti Shinde On Shinde Government – राज्यात नवं सरकार स्थापन होऊन महिना पूर्ण झाला आहे. पण अद्यापही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. याच दरम्यान, आता काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरात भाष्य करताना शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
“राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका होताच सत्ताधारी शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीत गेले. तेथे त्यांना मौज करताना झाडी, डोंगर आणि हॉटेलची कुतुहल वाटले. त्यांच्यासाठी काय झाडी, काय डोंगार..काय हॉटेल असं सगळंच ओकेमधी झालं आहे. परंतु इकडं महाराष्ट्र मात्र नॉट ओके झाला आहे,” अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी सेना बंडखोर आमदारांसह नव्या सरकारवर निशाणा साधला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, “एकीकडे केंद्र सरकारच्या सपशेल अपयशी आणि चुकीच्या धोरणांमुळे दररोजच महागाईचा भडका उडत आहे. त्याचा फटका घराचा गाडा ओढणाऱ्या गृहिणींना बसत आहे. नागपंचमीसारख्या सणासुदीला पुरणपोळी बनविण्याचीही पंचाईत पडली आहे. गहू, तेल, गूळ, डाळी असं सर्व प्रचंड महागलं आहे. तेव्हा पुरणपोळी कशी बनवून कुटुंबीयांना खाऊ घालायची, याचा दहावेळा विचार करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील सामान्य जनता आज नॉट ओके मध्ये आहे. त्याची काळजी अस्थिर सरकारला कशी राहणार?” असा टोलाही प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे.