Raj Thackeray : राज ठाकरेंचा त्र्यंबकेश्वरमधील गावकऱ्यांना सल्ला; म्हणाले, “शंभर वर्षे जुनी परंपरा…”

नाशिक | Raj Thackeray – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्र्यंबकेश्वरमधील (Trimbakeshwer) घटनेवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वरमधील गावकऱ्यांना सल्ला देखील दिला. शंभर वर्षे असलेली जुनी परंपरा मोडीत काढू नये, त्र्यंबकेश्वरमधील ही प्रथा थांबवणं योग्य नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे आजपासून (20 मे) दोन दिवस नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्र्यंबकेश्वरच्या घटनेचा निषेध करत त्यांनी स्थानिक गावकऱ्यांना याबाबत निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे. संदलची प्रथा ही शंभर वर्षे जुनी असेल तर ती मोडीत काढू नये. हा प्रश्न शांततेच्या मार्गानं सोडवावा. महत्त्वाचं म्हणजे हा गावचा विषय असल्यानं इतरांनी यात पडायचं काम नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
त्र्यंबकेश्वरची प्रथा ही जुनी आहे, असं समजलं. तेथे धूप दाखवण्याची परंपरा आहे, त्यांनी धूप दाखवण्याचा प्रयत्न केला. मग एवढा गदारोळ कसा काय झाला? आपला धर्म एवढा कमकुवत झाला आहे का की कोणी आल्यानं काही फरक पडतो. यातून कोणाला दंगली घडाव्यात असं वाटतं का? असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले, हा गावकऱ्यांचा विषय असून गावकऱ्यांनी एकत्र येऊन त्यावर निर्णय घेणं अपेक्षित आहे. तसंच या सर्व गोष्टींना सोशल मीडिया कारणीभूत आहे. कारण त्यावर या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्यातून गैरसमज पसरवले जातात. आता महाराष्ट्र पोलिसांना 48 तास द्या जेणेकरून दंगली घडणार नाहीत, असं सूचक विधानही राज ठाकरेंनी केलं.