‘तीन पक्षाचं सरकार आहे त्यामुळे…’; नाना पटोलेंनी केलेल्या आरोपांवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

मुंबई : भंडारा गोंदियात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला एकाकी पाडण्यात आलं आहे. तसंच राष्ट्रवादीने भाजपासोबत आघाडी केल्यानं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापले आहेत. यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यासाठी ट्वीट केलं आहे. येथील निवडणुकांत राष्ट्रवादीने भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसला एकाकी पाडल्यानं यावर कॉंग्रसेचे नाना पटोले यांनी खरमरती शब्दांत टीका केली आहे. ‘मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसलाय’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. आता यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात भुजबळ म्हणाले, तीन पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे थोड तरी घर्षण होणार आहे. एक पक्षाच सरकार असलं तरी होतं. इथ आम्ही तीनजण आहोत. जाहीर झालेल्या प्रभाग रचनेसंदर्भात ते म्हणाले, हा राज्य सरकारला धक्का मानत नाही. मध्य प्रदेशला ही हाच निर्णय देण्यात आला आहे. जर इंपेरिकल डेटा मिळाला असता तर हे संकट आलं नसतं. यामागे भाजपचा काय उद्देश आहे हे माहित नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.