“उद्धव ठाकरे संपलेला माणूस…”, नितेश राणेंची खोचक टीका
अमरावती | Nitesh Rane On Uddhav Thackeray – सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे. अमरावतीमध्ये भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या मुलाच्या लग्नामध्ये नितेश राणे यांनी हजेरी लावली होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. “उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे”, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.
यावेळी नितेश राणेंना प्रसारमाध्यमांनी नारेबाजीविषयी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “अशा पद्धतीची घोषणा आणि अशी नाटकं आमच्या महाराष्ट्रात चालणार नाहीत. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे. तुम्हाला तुमचे सण साजरे करायचे असतील तर शांततेत करा. हिंदुंना कोणतंही आव्हान द्यायचा प्रयत्न करायचा नाही. आता महाविकास आघाडीचं सरकार नाहीये. नवाब मलिक अल्पसंख्यांक मंत्री नाहीयेत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीयेत. ही सगळी नाटकं जे कुणी करत असतील, त्यांना पोलीस शोधून काढतील आणि पुन्हा अशा घोषणा होणार नाहीत याची काळजी आमचं सरकार घेईल.”
दरम्यान, ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महानगर पालिकेकडून स्वीकारला जात नसल्यामुळे या निवडणुकीसाठी दुसरा उमेदवार देण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केल्याबाबत विचारणा केली असता नितेश राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे काय करतात याची मला चिंता नाही. उद्धव ठाकरे संपलेला माणूस आहे. त्यावर जास्त कशाला बोलायचं?”, असा खोचक सवाल नितेश राणेंनी केला.