शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, प्रश्न सुटले नाहीत, तर…; राजू शेट्टींचे कार्यकर्त्यांना आवाहन, सरकारला इशारा!

मुंबई : (Raju Shetty On State Government) काही ठोस निर्णयांची आवश्यकता आहे. हा सविनय सत्याग्रह आहे. शेतकऱ्यांनी दोन दिवस ऊसाच्या तोडी नाकारायच्या आहेत. वाहनधारकांनी दोन दिवस वाहतूक करायची नाही, असा निर्णय घ्यायचा आहे. त्यातूनही कोणी रस्त्यावर ऊस आणल्यास सविनय पद्धतीने सांगायचं आहे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.
यंदाच्या हंगामातील स्वाभिमानीचे हे पहिलेच आंदोलन आहे. केंद्र सरकारने साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 3500 करावा, इथेनॉलच्या दरात 5 रुपयांची वाढ करावी तसेच ऊस परिषदेत केलेली एफआरपी अधिक 350 रुपये ही मागणी कारखानदारांनी पूर्ण करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे. कारखानदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो त्यावर स्वाभिमानीची पुढील रणनीती ठरणार असल्याचं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, शेतकऱ्यांची अस्वस्थता समजू शकतो, राग समजू शकतो, पण व्यक्त करण्याची ही वेळ नाही. 18 तारखेनंतर मी निश्चितच तुम्हाला कार्यक्रम देणार आहे, त्यावर निश्चितच तुम्ही राग व्यक्त करा. आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करा. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ऊसतोड कामगार, वाहन चालक आणि साखर कारखानदार यांनी प्रतिसाद द्यावा, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.