उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; तुरुंगात असलेल्या ‘त्या’ 15 शिवसैनिकांना पुरवली आर्थिक मदत

नांदेड : (Uddhav Thackeray On Shiv Sainik) काही वर्षांपूर्वी केलेल्या एका आंदोलनाप्रकरणी नांदेडच्या (Nanded) 19 आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना गेल्या आठवड्यात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. पण एवढ्या मोठ्या दंडाची रक्कम सर्वसामान्य शिवसैनिकांनी कशी भरावी असा प्रश्न पडला होता. मात्र याबाबत माहिती मिळताच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या शिवसैनिकांना ठोठवण्यात आलेल्या दंडाची रक्कम भरली आहे. विशेष म्हणजे ज्या दिवशी शिक्षा सुनावण्यात आली त्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा शब्द दिला होता. दरम्यान त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. अशी शिवसैनिकांत चर्चा सुरू झाली आहे.
कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो, त्यामुळे हा कणा मजबूत असल्यास पक्षही मजबूत असतो. मात्र अनेकदा पक्षासाठी राबराब राबणाऱ्या कार्यकर्त्याला अडचणीत पक्षाकडून मदत मिळत नाही. परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कट्टर शिवसैनिकांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिला. आणि त्याप्रमाणे करूनही दाखवलं आहे.
नांदेडमध्ये 2008 ला झालेल्या महागाईच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि या प्रकरणात 11 एप्रिल रोजी न्यायालयाने 19 आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना पाच वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी 1 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. परंतु सर्वसामान्य कुटुंबातील अनेक शिवसैनिकांना हा दंड भरणं शक्यचं नव्हते. दरम्यान ही बाब मातोश्रीपर्यंत पोहचली आणि सूत्र हलले. दरम्यान शनिवारी तुरुंगात असलेल्या 19 जणांपैकी 15 जणांच्या दंडाची रक्कम पक्षाकडून न्यायालयात भरण्यात आली.
2008 साली राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना महागाईच्या विरोधात शिवसेनेच्या तत्कालीन आमदार अनुसया खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हिंगोली गेट येथे आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले आणि त्यामध्ये आठ बसेस, पोलिस वाहनांचे नुकसान झाले. तसेच दोन उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी जखमी झाले. त्यामुळे वजिराबाद पोलिसांनी तब्बल 19 जणांवर गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणावर 11 एप्रिल रोजी न्यायालयाने निकाल दिला.