बारा तास कीर्तनमालेने केले वारकर्यांचेे स्वागत
![बारा तास कीर्तनमालेने केले वारकर्यांचेे स्वागत soniya gandhi 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/soniya-gandhi-1-780x470.jpg)
पुणे ः वारकरी संप्रदायाचा भगवा पताका आसमंती उंचवत, ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात पंढरपूरला चालत जाणार्या वारकर्यांच्या स्वागतासाठी पुण्यात सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त युवा कीर्तनकारांची अखंड कीर्तनमाला कसबा पेठेतील लालमहाल येथे उत्साहात पार पडली. वारकरी व विठ्ठलभक्तांनी या कीर्तनमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व पुणे पीपल्स को-ऑप. बँकेतर्फे वै.ह.भ.प. महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी स्मरणार्थ सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते.
कीर्तनमालेचे उद्घाटन लाल महालाचे रखवालदार गिरीश कटारे, पुणे मनपा आरोग्य विभागाचे स्वच्छता दूत चंद्रमणी कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे आदी मान्यवर उपस्थित होते. युवा कीर्तनकार ह.भ.प. श्रेयस बडवे, रेशीम खेडकर, सिद्धी कुलकर्णी, ज्ञानदा बुरसे, मंदार गोखले, विकास दिग्रजकर, निहाल खांबेटे, होनराज मावळे यांनी कीर्तन केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कीर्तनकारांनी क्रांतिकारक व स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रपुरुषांविषयी कीर्तन केले. मुकुंद कोंडे, सिद्धार्थ कुंभोजकर, शुभम उभे यांनी साथसंगत केली.