ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…तेव्हा हिटलरही असाच माजला होता”, उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल!

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देशात घडणाऱ्या विविध घटनांचा उल्लेख करत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडलं. मोदी सरकारने शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांना धमकी दिली होती. तसेच भाजपा मंत्री स्मृती इराणींना प्रश्न विचारला म्हणून एका पत्रकाराला नोकरीवरून काढलं, अशा उदाहरणांचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते वरळी येथे ठाकरे गटाच्या शिबीरात बोलत होते.

उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, “जेव्हा आपल्या देशात शेतकरी आंदोलन सुरू होतं. तेव्हा मोदी सरकारने ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांना धमक्या दिल्या. शेतकरी आंदोलनाची बाजू घेणारे ट्वीट डिलीट करा, नाहीतर भारतातील ट्विटरच्या कार्यालयात धाडी टाकू, तुम्हाला त्रास देऊ, अशी धमकी मोदी सरकारने दिली. स्मृती इराणींना एका पत्रकाराने प्रश्न विचारला म्हणून इराणींनी वृत्तपत्राच्या मालकाशी बोलून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला नोकरीवरून काढलं. त्यामुळे आपण कोणत्या दिशेनं चाललोय, हे आपल्याला तरी कळतंय का?”

“हिटलरसुद्धा असाच माजला होता. हिटलर म्हटलं की, त्याच्या छळ छावण्या, अनेक लोकांची केलेली कत्तल हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं. पण हिटलर काही अचानक जन्माला आला नाही, हे लक्षात घ्या. त्याने सत्तेत आल्या-आल्या लगेच छळ छावण्यांचं टेंडर काढलं नव्हतं. पहिल्यांदा त्याने प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणायला सुरुवात केली,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“आपल्या विरोधातील बातम्या प्रसिद्ध होणार नाहीत, ही काळजी त्याने सर्वप्रथम घेतली. त्यानंतर एक-एक करत ते विरोधी पक्ष संपवत गेले. विरोधी पक्षांच्या समर्थकांचा छळ सुरू केला. सत्य काय आहे? हे एकच पक्ष ठरवायला लागला. जे सत्य आहे, ते दडपून टाकायचं आणि आम्ही म्हणू तेच सत्य आहे, असं हिटलरचा पक्ष ठरवू लागला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं डोळ्यादेखत घडत असताना सर्वसामान्य जनता निपचित पडून राहिली. तेव्हा हिटलर माजला. त्यामुळे आपल्या देशाची वाटचालही हिटलरच्या दिशेनं चालली नाही ना? असा प्रश्न पडतो. कारण हिटलरचं चिन्हही स्वस्तिक होतं,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये