“आफताबचे 35 ऐवजी 70 तुकडे केले तरी…”, अजित पवार संतापले, सरकारकडे केली ‘ही’ मागणी

नागपूर | Maharashtra Assembly Winter Session 2022 – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं (Shraddha Walker Murder Case) संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. तसंच या प्रकरणाचे पडसाद आज (20 डिसेंबर) विधानसभेत उमटले आहेत. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संतप्त शब्दांत भूमिका मांडली.
श्रद्धा वालकरनं आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव असल्याच्या चर्चा सुरू होत्या. हा दबाव राजकीय होता का? असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला. तसंच अमरावती येथे कोल्हे प्रकरण घडलं त्यावेळी एनआयएनं प्रकरण हातात घेतल्यानंतर हत्येचं खरं कारण समोर आलं. त्यामुळे श्रद्धानं तक्रार मागे घेण्याबाबत त्यावेळीच्या सरकारमधील प्रमुखांचा दबाव होता का? असा प्रश्न भातखळकरांनी विचारला. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारं आहे. माझी तिच्या वडिलांशी भेट झाली आहे. त्यांनी मला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ज्या फ्रीजमध्ये गुन्हेगारानं तुकडे ठेवले होते तिथंच ठेवलेले कोल्ड्रिंक तो पित होता. तसंच या प्रकरणात राजकीय दबाव आढळून आलेला नसल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. श्रद्धानं तक्रार दाखल केली आणि एक महिन्यानंतर अर्ज मागे घेतला होता. आम्ही आता त्या एक महिन्यात पोलिसांनी नेमकी काय करवाई केली याची चौकशी करत आहोत. आम्ही पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली.
या चर्चेनंतर अजित पवारांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली. “माझ्या माहितीप्रमाणे आता हे सगळं प्रकरण दिल्ली पोलिसांकडे आहे. दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. आपण थेट अमित शाह यांच्याशी बोलू शकता. हे सभागृहातल्या किंवा महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्याही व्यक्तीला पटतच नाही. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. कोंबडीचे 35 तुकडे करायचे म्हटलं तरी 10 वेळा विचार केला जातो. पण इथे एका मुलीचे 35 तुकडे केले गेलेl. या सगळ्या घटना वेदनादायक आहेत”, असं अजित पवार म्हणाले.
“माझी विनंती आहे की या प्रकरणात आता फास्ट ट्रॅक कोर्ट नेमून आफताब पूनावालाला तातडीनं फाशीची शिक्षा कशी होईल हे बघावं. कारण तो सरळ सरळ गुन्हा कबुल करतोय. त्यात वकील मंडळी पुरावे वगैरे बघतीलच. पण याबाबत स्वत: गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं तर त्यातून देशात एक संदेश जाऊ द्या, की असं जर केलं तर गंभीर शिक्षा होते. आफताब पूनावालाला फाशीची शिक्षा द्यावीच लागेल. आपल्याकडे असा काही कायदा असता की त्यानं श्रद्धाचे 35 तुकडे केले, तसे याचेही 35 तुकडे केले पाहिजेत. 35 ऐवजी 70 तुकडे केले तरी सगळ्यांना समाधान वाटेल असा हा नालायक माणूस निघाला आहे”, असंही अजित पवार म्हणाले.
“सरकारनं या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्र्यांशी बोलून या प्रकरणाचा कसा लवकरात लवकर निकाल लागेल आणि त्याला कडक शासन होईल याबाबत आपण कार्यवाही करणार का?” अशी मागणीही अजित पवारांनी केली.