चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली; म्हणाले, “आंबेडकर, फुले, कर्मवीर यांनी…”

पैठण | Chandrakant Patil – मागील काही दिवसांपासून भाजपच्या (BJP) नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. तसंच आता भाजपचे नेते, आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची जीभ घसरली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आंबेडकर, फुले, कर्मवीर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं असून आता नवीन वादाल तोंड फुटण्याची शक्यता आहे.
चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चंद्रकांत पाटील हे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
सरकार त्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांनी शाळा उघडल्या. आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या आहेत. सरकारनं या शाळा सुरू करताना त्यांना अनुदान दिलेलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी गळ्यातील उपरणं पुढे पसरवून दाखवलं.
पुढे ते म्हणाले, मला पैसे द्या असं ते म्हणायचे. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे, असंही पाटील म्हणाले.
2 Comments