पिंपरी चिंचवडसिटी अपडेट्स

जनसंवाद सभेकडे नागरिक फिरवताहेत पाठ

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासकांच्या जनसंवाद सभेकडे नागरिक पाठ फिरवताना दिसून येत आहेत. आज आठही क्षेत्रीय कार्यालयांत पार पडलेल्या जनसंवाद सभेत ८९ नागरिकांनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे ८, १०, ६, ८, ५, १०, २२ आणि १० नागरिकांनी उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.
घरोघरी तिरंगा या उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन आज पार पडलेल्या जनसंवाद सभेच्या माध्यमातून करण्यात आले. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या निर्देशानुसार १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रामध्ये देखील घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे यासाठी जनसंवाद सभेच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वयक अधिकारी असलेले पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत जोशी, समाज विकास विभागाचे उपायुक्त , पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले. तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयांचे क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अभिजीत हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सीताराम बहुरे, विनोद जळक, विजयकुमार थोरात हे उपस्थित होते. आठही क्षेत्रीय कार्यालयांतील जनसंवाद सभेत स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता, उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी नियंत्रित अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारवजा सूचना मांडल्या. त्यामध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी, पाणीपुरवठा स्वच्छ आणि योग्य दाबाने करावा, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक जनजागृती करण्यात यावी, अनधिकृत बांधकामांवर तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी, अनधिकृत पत्राशेड हटवावे, रस्त्यावरील गतिरोधक नजरेस पडावेत यासाठी त्यावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होत आहे तो पूर्ववत करावा, ड्रेनेज लाईनची कामे करावी, अनधिकृतपणे ड्रेनेज वाहिन्यांना जोडणी केलेल्या मिळकतधारकांवर कारवाई करावी, रहदारीस अडथळा होत असल्याने पदपथ आणि दुकानांसमोरील अतिक्रमणे हटवावी, रस्ता रुंदीकरण करावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, सुलभ शौचालयांमध्ये मुबलक पाणीपुरवठा करावा, रोडवरील पार्किंग ठिकाणी कायमस्वरूपी असलेली वाहने हटवावीत, वृक्षारोपणास जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये