ताज्या बातम्यारणधुमाळी

“हे नामर्द सरकारच…”, संजय राऊतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

मुंबई | Sanjay Raut – बेळगावमध्ये ‘कन्नड रक्षण वेदीके’ सारख्या संघटनांकडून महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड झाल्यानंतर महाराष्ट्र – कर्नाटक वाद चांगलाच पेटला आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) हल्लाबोल केला आहे. हे सरकार लाचार आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत टीकास्र सोडलं.

यावेळी संजय राऊत म्हणाले, “शिंदे असतील किंवा फडणवीस कारभार कुणाच्याही नावानं चालू द्या. हे सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेचं, सार्वजनिक मालमत्तेचं, जमिनीचं रक्षण करण्यात अपयशी ठरलं आहे. या सरकारला एकही दिवस सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही हे त्यांनी मान्य करायला हवं. 24 तासांपासून सीमाभागात सरकारी प्रेरणेनं महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड होतेय, हल्ले होतायत आणि प्रतिकार करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून तुरुंगात डांबलं जातंय. महाराष्ट्र सरकार आहे की नाही?” असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.

“केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला जात आहेत. पण उपयोग काय आहे? महाराष्ट्रात काय चाललंय हे त्यांना कळत नाही का? महाराष्ट्राचे लचके तोडता यावेत, म्हणून शिवसेनेचं सरकार घालवण्यात आलं. अशी वेळ महाराष्ट्रावर कधी आली नाही. महाराष्ट्रानं इतके हतबल मुख्यमंत्री, इतकं लाचार सरकार गेल्या 55 वर्षांत पाहिलेलं नाही. काल दोन मंत्र्यांनी शेपूट घातलं. ते बेळगावमध्ये जाणार होते. हे म्हणे मर्द आणि स्वाभिमानी. काय चाललंय राज्यात? डरपोक सरकार”, अशा शब्दांत संजय राऊतांनी सरकारवर टीका केली.

पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्रात कर्नाटकचा मुख्यमंत्री घुसून दादागिरी करतो. मुख्यमंत्री स्वत:ला भाई समजणारे आहेत ना? त्यांना भाई म्हटलं जातं. त्यांनी भाईगिरी दाखवावी ना. मग कसले भाई तुम्ही? भाई काय, तुम्ही कधी बेळगावात लाठ्या खाल्ल्या, याचा इतिहास दाखवा. नाहीतर राजीनामा द्या. या सरकारला सत्तेवर एक मिनीटही राहण्याचा अधिकार नाही. आज हा प्रश्न अचानक उफाळला आहे. केंद्राच्या पाठिंब्याशिवाय हे होऊ शकत नाही. ताबडतोब सरकारनं बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करा. नाहीतर महाराष्ट्राला वेगळी पावलं उचलावी लागतील. तुमचं महाराष्ट्रातलं सरकार गेलं खड्ड्यात”, असा इशारा देखील संजय राऊतांनी दिला आहे.

“आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची, सीमांची काळजी यांना नाहीये. 105 हुतात्म्यांनी रक्ताचं पाणी करून हा महाराष्ट्र आणि मुंबई मिळवली. पण सरळ हे सीमा कुरतडतायत. सरकार मात्र षंढासारखं आणि नामर्दासारखं बसलंय. हे नामर्द सरकारच आहे. अशा वेळी विरोधी पक्षाची जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. तीन महिन्यांपासून सरकारनं महाराष्ट्राचं दिल्लीतल्या दारातलं पायपुसणं करून टाकलं आहे”, असंही राऊत म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये