शरद पवार- देवेंद्र फडणवीसांच्या एकत्र प्रवासाबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “कटुता संपविण्याचे…”
मुंबई | Sanjay Raut – काल (8 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यांनी केलेल्या एकत्र प्रवासावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अनेक नेत्यांनी यावर आपलं मत मांडलं आहे. यामध्ये आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
“शरद पवार हे राज्याचेच नव्हे तर देशाचे महत्त्वाचे आणि मोठे नेते आहेत. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासोबत प्रवास केला. कटुता संपविण्याचं हे पहिले पाऊल असेल. पण माझ्या माहितीप्रमाणे शरद पवारांसोबत फार काळ कटुता ठेऊ शकत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीची कटुता निर्माण झाली आहे. ती कटुता संपविण्यासाठी मी पुढाकार घेईल”, असं देवेंद्र फडणवीस काही महिन्यांपुर्वी म्हणाले होते. त्यावेळी मी त्या वक्तव्याचं स्वागत केलं होतं. मागच्या 60-65 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात एवढी टोकाची कटुता, द्वेष, सुडाचं राजकारण कधीही पाहिलं गेलं नाही. राजकीय मतभेत हे होतच असतात. पण महाराष्ट्रात ज्यापद्धतीचं राजकारण होत आहे, ही आपली परंपरा नाही. सत्तांतरे होत असताना इतक्या टोकाची कटुता कधी पाहिली नाही. कटूता संपविण्याचे नेतृत्व फडणवीस करत असतील तर महाराष्ट्र नक्कीच त्यांचं स्वागत करेल. महाराष्ट्राच्या राजकारणात जी विषाची उकळी फुटली आहे, ती संपुष्टात आली पाहीजे.”, असंही संजय राऊत म्हणाले.