मोठी बातमी! शेतकऱ्याचा विधानभवनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; गंभीर भाजलेल्या शेतकऱ्यावर उपचार सुरु
मुंबई : महाराष्ट्रात सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, राज्य सरकारकडून फक्त मदतीच्या घोषणा केल्या जात आहेत. लोकप्रतिनिधी मागील दोन महिन्यांपासून सत्ता संघर्षात गुंतलेले होते. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर देखील त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन करायला वेळ लावला. सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. दरम्यान, विरोधी पक्षांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा उचलून धरला जात आहे. सरकारकडून देखील मदतीच्या घोषणा केल्या गेल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजून कोणतही मदत न मिळाल्याचे चित्र आहे.
पूरस्थिती आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी हताश झालेला दिसत आहे. अशा परिस्थितीत आज विधानभवनाबाहेर एका शेतकर्याने टोकाचे पाऊल उचलत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यभरातून सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सुभाष भानुदास देशमुख असे या साताऱ्याच्या शेतकऱ्याचे नाव आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत पोलिसांनी शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून देखील सरकारला धारेवर धरले जात आहे.