‘इजिप्सी’मधून गूढ, अद्भुत इजिप्तची सफर
पुणे : चरित्र, आत्मचरित्र, माहितीपर लेखन यांसारख्या ज्ञानलक्षी व प्रवासवर्णनपर साहित्यकृतींना वाचकांची मोठी मागणी आहे. मध्यमवर्गीय माणसालाही आपण जग पाहायला हवे, अशी भावना गेल्या काही वर्षात रुजत आहे. प्रवास करतानाच लेखनाची कला विकसित होतेय, ही मराठी साहित्याच्या समृद्धतेत भर घालणारी गोष्ट आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
“ज्ञानलालसा आणि जिज्ञासू वृत्ती जोपासल्याशिवाय असे प्रभावी लेखन होत नाही. इजिप्तला आपण प्रत्यक्ष जाऊन यावे, ते आपल्या डोळ्यांनी पाहावे, इतक्या प्रभावीपणे त्याची मांडणी केली आहे. इजिप्शियन संस्कृती, समाज, शहरांची रचना, वारसास्थळे अशा विविधांगी गोष्टींची सफर वाळेकर ‘इजिप्सी’मधून घडवतात,”
– प्रा. मिलिंद जोशी
मनोविकास प्रकाशनातर्फे रवि वाळेक रलिखित ‘इजिप्सी : एक गूढ, अद्भुत सफर’ या ग्रंथाचे प्रकाशन प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या प्रकाशन सोहळ्यावेळी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, प्रकाशक ‘मनोविकास’चे अरविंद पाटकर, वाळेकर यांच्या पत्नी शिल्पा उपस्थित होते. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ, तर गौरी खराडे यांनी ग्रंथाची मांडणी व सजावट केली आहे.
मिलिंद जोशी म्हणाले, ‘पु. ल. देशपांडे, अनिल अवचट, मीना प्रभू यांसारख्या लेखकांनी प्रवासवर्णन या साहित्याला वेगळी ओळख दिली. रवि वाळेकर हे या मालेतील एक सूर गवसलेले लेखक आहेत. उघड्या डोळ्यांनी जग पाहत, त्याचे अतिशय रसाळ, सहज, ओघवत्या, मिश्कील पण तितक्याच गांभीर्याने केलेले वर्णन वाचकाला गुंतवून ठेवते. वाळेकर यांच्या लेखनात सूक्ष्म निरीक्षण, विनोदबुद्धी आहे. ते तात्कालिक न वाटता दीर्घकालीन वाटतात.