संडे फिचर

विचारांचं बाळकडू मागे राहिलं…

आज बहुसंख्य परदेशस्थ मुलांना आई-वडील आपल्याजवळ राहायला हवे आहेत; त्यांना भारतात येणं शक्य नाही. अनेक पालकांनी आपल्या मुलांना भावनात्मक, संवेदनात्मक जगाची ओळख करून दिलेली नाही. त्यांनी मुलांना क्लास लावले, वाढदिवस नव्हे, तर ‘बर्थ डे सेलिब्रेट’ केले. त्यांच्यात मॉल संस्कृती रुजवली. पण भावनांचं, अश्रूंचं, झुरण्याचं, तगमगीचं, लग्न हा संस्कार आहे करार नाही या विचारांचं बाळकडू देण्यात ते कमी पडले.

पुढे जाण्याची आस, इच्छा बाळगणं आणि त्याच वेळी मागे वळून पाहणं ही उच्च मध्यमवर्गीय मानसिकता आहे. कारण सामान्य मध्यमवर्ग त्याच्या धावपळीच्या जीवनमानामध्ये, जगण्याच्या क्लिष्टतेमध्ये गुंतला आहे. नव्या-जुन्याचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. अजूनही तो सकाळी नऊ ते रात्री नऊच्या पोटार्थी चक्रातच गुंतला आहे, दुसरीकडे अगदी गरीब वर्गापर्यंत ही वैचारिकताच पोहोचलेली नाही.

या विचारांपर्यंत येण्यास पुढची काही वर्षं जावी लागतील. त्यामुळेच आपण पुढे वाटचाल करतोय की भूतकाळात गुंततोय, या मुद्द्याचा विचार करताना उच्च मध्यमवर्गच गृहीत धरू शकतो. साहजिकच सगळी मांडणी त्या अनुषंगानेच होते.

आज उच्च मध्यमवर्गात मोडतात ते कधी काळी मध्यमवर्गीय होते. त्यातल्या बहुतेकांचं बालपण संघर्षात गेलं आहे. अनेकांना अनेक प्रकारची तडजोड करत मार्ग काढावा लागला आहे. या मातीत राहिल्यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागला, ही त्यातल्या अनेकांची मानसिकता आहे. हा चाळीत राहणारा, आई-वडिलांची कर्ज फेडणारा वर्ग आहे. बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडणारा आहे, काही वर्षांनी तो स्थिर झाला आणि त्यांना मुलं झाली तेव्हा मी सोसलं ते मुलांना सोसावं लागू नये, अशी त्याची स्वाभाविक भावना होती.

म्हणूनच पाकात गुलाबजाम ठेवावा त्या पद्धतीने त्यांनी आपल्या मुलांना या सगळ्यापासून दूर ठेवलं. त्यांच्या नावे विमा पॉलिसी, बचत ठेवी, उच्च शिक्षणाच्या खर्चाची तरतूद आदी करून ठेवण्यास प्राधान्य दिलं. या वर्गाने आपल्या मुलांना कटाक्षाने इंग्रजी माध्यमात शिकवलं. आपली परदेशी जाण्याची स्वप्नं त्यांच्या रूपाने पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या वर्गानं अशी सगळी पूर्वतयारी केली आणि मुलांना परदेशी पाठवलं. उच्च शिक्षण घेऊन मुलं आता तिथेच स्थिरावली असून नोकरी, व्यवसायात व्यग्र आहेत.

परदेशात शिकलेल्या, तिथेच स्थायिक झालेल्या अनेक मुलांचे पालक आता सत्तरीपार पोहोचले आहेत. त्यांना परदेशात मुलांसवे नव्हे, तर आपल्या देशात राहावंसं वाटतं. पण आता ते आपल्या देशाचा गोडवा गात असतील, मुलांकडे न राहता आपला वृद्धापकाळ भारतात घालवू इच्छित असतील, तर त्यात उदात्त विचार वा देशाप्रति प्रेमभावना असेलच असं म्हणता येणार नाही. मुलं परदेशी गेली तेव्हा त्यांना वार्धक्य आलेलं नव्हतं. पण आता या वयात त्यांना पुढे गेलेल्या मुलांनी आपल्यासाठी परत यावं, असं वाटत आहे.

परदेशी वातावरणात ही जुनी खोडं रुजत नाहीत. ते वातावरण त्यांना परिचित नाही. कदाचित काही जणांना परावलंबित्व नकोसं वाटू शकतं. काहींना मुला-मुलींचे पाश्‍चात्त्य विचार, राहणीमान अथवा ती जीवनशैली रुचत नसावी. आता मुलांच्या आयुष्यात आपलं स्थान नसलेलं बघून काहींचा अहंभाव दुखावतो आणि ते मायदेशी राहणंच पसंत करतात.

अलीकडेच मला एका स्त्रीच्या अंत्यविधीला उपस्थित राहावं लागलं. ती महिला एकटीच राहायची. तिच्या निधनाची वार्ता समजल्यावर मुलांनी परदेशातून फोन केला आणि अंत्यविधीची भाडोत्री सोय करणार्‍या एका संस्थेकडे पुढची सगळी जबाबदारी सोपवली. ती मंडळी सगळं काम व्यावहारिक पद्धतीने करत होती. त्यांनीच हार विकत आणले, मडकं धरणारा माणूसही त्याच संस्थेचा होता.

त्या महिलेची मुलं व्हिडिओवर हे सगळं पाहत होती आणि इकडे मी अत्यंत अलिप्तपणे हे सगळं अनुभवत होतो. तेव्हा विचार आला, की मरते वेळी त्या महिलेच्या मनात किती आणि कोणत्या विचारांचं काहूर माजलं असेल. आपण मुलांना परदेशी जाण्यापासून अडवलं असतं, मुला-सुनांशी जुळवून घेतलं असतं, नातवंडांमध्ये रमलो असतो, त्यांची जीवनशैली आत्मसात केली असती, तर कदाचित आज घरातलं कोणी तरी आपल्याला पाणी पाजायला असू शकलं असतं…

थोडक्यात, ती बाई अट्टहासानं मागे राहिली. आपल्याच अटी-शर्तींवर जगली, तरी तिला अखेर काय मिळालं, हा प्रश्‍न उरतोच. कारण मध्यमवयातला एकटेपणा सहन करण्याजोगा असतो. त्या वेळी पैशांची ऊब असते. प्रौढपणात तारुण्याची मग्रुरी असते. अशा वेळी तिचा हात धरण्यासाठी कोणी हात पुढे केला, तरी ती तो हात झटकते. तिला कोणाचाही आधार नको वाटतो.

पण सासूने पन्नास वेळा सुनेचा हात झटकला, तर गरज भासेल तेव्हा ती का हात धरेल, हा प्रश्‍न उरतो. थोडक्यात, उच्च मध्यमवर्गामधली वृद्ध पिढी आज गरजेपोटी मागे जाऊ इच्छित आहे. त्यांनी मुलांना परदेशी पाठवलं. पण हे करतानाच मुलांना मातीची ओढ लावली असती, मुळं धरून ठेवण्याची शिकवण दिली असती, तर इतकी विदारक स्थिती उद्भवली नसती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये