राष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचरसंडे मॅटिनी

पावसाळा आणि आयुर्वेद

-डॉ. हर्षवर्धन वसंतराव गायकवाड, (एम. डी. आयु.) द्वारका आयुर्वेदिक हॉस्पिटल व केरळीय पंचकर्म केंद्र शाखा – कोथरूड, पुणे व अकलूज

पावसाची पहिली सर वृक्षवल्लींपासून सर्वच प्राणीमात्रांना सुखावून जाते. पावसामुळे अनेक प्रकारची गैरसोय होत असली तरी प्रत्येकालाच पाऊस वेळेवर येत आहे ना, पुरेसा पडतो आहे ना, याची उत्सुकता लागलेली असते आणि खरोखरच निसर्गाची भरभरून देण्याची प्रवृत्ती पावसाळ्यात अनुभवायला मिळते. पावसाळा मणजे डॉक्टरांसाठी सर्वात ‘बिझी’ वेळ असे गमतीने म्हटले जाते आणि प्रत्यक्षातही तसेच दिसते.

आकाशात दाटलेले मेघ एखाद्याचे सांधे जखडवून डोळ्यांतूनही पाणी बरसवण्यास समर्थ असतात. तर कुणा दमेकऱ्याची साखरझोप उद्ध्वस्त करून पहाटे पहाटे धावपळ करवू शकतात. एकंदरीतच पावसाळ्यात ‘वाताचे’ आजार उफाळतात. अपचन, सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप, कावीळ, हगवण, संधीवात, गुडघेदुखी, पाठदुखी, सायटिका असे वातविकारही डोके वर काढतात. जोडीला मरगळ, थकवा, निरुत्साह असतेच. असे सगळे व्हायला कारण असते तरी काय? तर याचे कारण आयुर्वेदशास्त्र सांगते की, पावसाळ्यात शरीरातील वातदोषाचा प्रकोप होत असतो, पचनशक्ती खालावलेली असते, शरीरशक्ती सर्वात कमी होते आणि अगोदरच्या ऋतूत म्हणजेच उन्हाळ्यात तापलेल्या धरतीवर पावसाचे पाणी पडल्यामुळे जमिनीतून निघणाऱ्या गरम वाफांमुळे शरीरातील पित्तदोष साठण्यास सुरुवात होते. अर्थातच वात – पित्त असुंतलन, मंद अग्नि, कमी झालेली शरीरशक्ती या सर्वांमुळे प्रकृती स्वास्थ्य धोक्यात येते. मात्र’ आरोग्य रक्षण’ हेच आद्यकर्तव्य असणाऱ्या आयुर्वेदशास्त्राने असे न होण्यासाठी आणि यदाकदाचित झालेच तर त्यासाठीही मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

वरील आजारांचा प्रतिबंध करावयाचा असल्यास खालील गोष्टी जरूर कराव्यात.

 प्यायचे पाणी उकळून घ्यावे व थंड करून प्यावे
 रोज घरात सकाळ-संध्याकाळ धूप करावा, हवेतील जंतूच्या प्रतिकारासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
 भुकेचा विचार करून सहज पचेल असे अन्न सेवन करावे.
 अन्न शक्यतो ताजे व गरम असतानाच खावे.
 विशेषतः रात्री मुगाची खिचडी, मुगाचे कढण व भात, पालकाचे सूप, रव्याची पातळ लापशी असा ‘द्रवाहार घ्यावा.
 भाज्या बनविताना हिंग, आले, हळद, ओवा, बडीशेप, दालचिनी, जिरे वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरावेत.  जेवणाची इच्छा होत नसल्यास, थोडेही जेवले तरी पोट जड वाटत असल्यास, तसेच मलप्रवृत्ती चिकट होत असल्यास जेवणाच्या सुरुवातीला घासभर भातासह पाव चमचा हिंगवाष्टक चूर्ण किंवा लवणभास्कर चूर्ण व दोन थेंब गाईचे तूप मिसळून खावे व नंतर हलके जेवण घ्यावे.  जुलाब होत असल्यास सकाळ-संध्याकाळ आल्या – लिंबाचा रस घ्यावा. शक्यतो लंघन करावे, साळीच्या लाह्या खाव्यात.
 सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी चमचाभर एरंडेल तेल टाकून तयार केलेली भाकरी खावी.

उपयुक्त पंचकर्म – बस्ती
पावसाळ्यात वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी औषधांनी सिद्धतेलांची बस्ती (आयुर्वेदिक एनिमा) सर्वात उत्तम असतो. त्यामुळे पावसाळ्यात वयानुसार वाताच्या काळात असलेल्यांनी म्हणजेच वय वर्षे ४५-५० च्या पुढच्या व्यक्तींनी बस्तीप्रयोग तज्ज्ञ वैदयांच्या मार्गदर्शनाखाली अवश्य करून घ्यावा. तसेच विशेषत: वातविकार असलेल्यांनी उदा. गुडघेदुखी, कंबरदुखी, संधीवात, आमवात, सायटिका, अर्धांगवायू वगैरे काहींनी ग्रस्त असलेल्यांसाठी ‘बस्ती उपक्रम जणू वरदान ठरू शकतो. अशा प्रकारे आहारामध्ये, आचरणामध्ये आवश्यक ते बदल, घरी उपलब्ध असणाऱ्या औषधी वन‌स्पतींचा वापर, पंचकर्मातील बस्ती उपक्रम यांच्या योगाने वात- पित्त दोषांचे संतुलन साधता आले, पचनसंस्था कार्यक्षम ठेवता आली व शरीरशक्ती राखता आली तर पावसाळ्यासारखा अवघड ऋतुही सहज पार होऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये